सांगली : चालू वर्षी क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना २५ लाख शुद्ध ऊस रोपे तयार करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी दिली. कारखाना ऊस रोपवाटिकेमध्ये ऊसरोपे तयार करण्याच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी टिशू कल्चर रोपांचेही वितरण करण्यात आले.
लाड म्हणाले, ऊस लागणीसाठी रोपांचा वापर केल्यामुळे एकरी उत्पादनात ८ ते १० टनाची वाढ होत आहे. कारखाना कार्यक्षेत्रात ऊस रोपांची लागवडीत वाढ झाली आहे. पहिल्या गाळप हंगामापासूनच योग्य बियाणे मिळावेत म्हणून अरुण लाड प्रयत्नात आहेत. त्रुटी असलेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होतेच, शिवाय गाळप हंगामावर ही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही करत असलेला हा प्रयत्न आहे.
‘क्रांती’ मार्फत एकरी ऊस उत्पादनवाढीसाठी दरवर्षी विविध ऊसविकास योजना राबविल्या जातात. यामध्ये ऊस लागवडीसाठी आवश्यक सर्व निविष्ठा व मजूर खर्चासाठी अर्थसहाय्य यांचा समावेश आहे- काही शेतकरी कांडी पध्दतीने उसाची लागण करतात, परंतु कांडीऐवजी रोप पद्धतीने लागण केल्यास तुटाळी सांधण्याचा खर्च वाचतो, पाण्याची क मजूर खर्चात बचत होते, याशिवाय रोप लागणीमध्ये एकाचवेळी येणारे फुटवे यामुळे उत्पादनात वाढ होते. यावेळी उपाध्यक्ष दिगंबरा पाटील, संचालक सुकुमार पाटील, अनिल पवार, जयप्रकाश साळुंखे, दिलीप थोरबोले, जितेंद्र पाटील, सी. एस. गव्हाणे उपस्थित होते.