पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल तयार करण्यासाठी राज्याच्या सहकार विभागाकडून शासन निर्णय दि. 18/4/2022 रोजी पारित करण्यात आलेला होता. या शासन निर्णयानुसार सविस्तर परिपत्रक राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून दि. 31/5/2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. राज्यातील साखर उद्योगाच्या व्यवस्थापनाची धुरा सक्षमपणे पार पाडण्यासाठी कार्यकारी संचालक कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संकल्पनेतून कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेत आमूलाग्र बदल करणेचा निर्णय तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतला होता.
या निर्णयानुसार कार्यकारी संचालकांची परीक्षा प्रथमच पूर्व, लेखी व मौखिक चाचणी अशा तीन टप्प्यामध्ये घेण्याचा निर्णय करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यातील चाळणी परीक्षा दि. 5 एप्रिल 2024 रोजी, दुसऱ्या टप्प्यातील लेखी परीक्षा दि. 4 मे 2024 रोजी व लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मौखिक चाचणी परीक्षा दि. 19 जुलै ते 22 जुलै दरम्यान वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान (पुणे) येथे घेण्यात आल्या होत्या. मौखिक चाचणी परीक्षा चालू असतानाच लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या काही उमेदवारांनी निवड प्रक्रिया सदोष असलेचे कारण पुढे करून मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे याचिका क्र 7267/2024 दि. 8 जुलै 2024 रोजी दाखल करून निवड प्रक्रियेला आव्हान दिले होते.
या याचिकेवर सविस्तर प्राथमिक सुनावणी होऊन मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद यांनी दि. 18 जुलै 2024 रोजी आदेश पारित करून मौखिक चाचणी परीक्षा घेण्यास अनुमती दिली होती. तथापि, लेखी परीक्षेचे उमेदवारांचे गुण बंद लिफाफ्यामध्ये उच्च न्यायालयात सादर करणेचे व परीक्षेचे अंतिम निकाल प्रसिद्ध न करण्याच्या सूचना साखर आयुक्त कार्यालय व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान यांना दिले होते. तदनंतर या ना त्या अशा अनेक कारणांमुळे या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर पडलेली होती. तथापि या याचिकेवरील अंतिम सुनावणी दि. 20 जानेवारी 2025 रोजी न्यायमूर्ती संजय मेहरे व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांचे खंडपीठासमोर पार पडली.
सुनावणी दरम्यान निवड प्रक्रियेला आव्हान दिलेल्या अनेक याचिकेमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे दाखले वादी व प्रतिवादी यांच्यातर्फे करून जोरदार युक्तिवाद पार पडला होता. निवड प्रक्रियेस आव्हान देणारी याचिका मा. उच्च न्यायालयाकडून दि. 07/02/2025 रोजी फेटाळण्यात आल्याने कार्यकारी संचालकांच्या पॅनल परीक्षेचे अंतिम निकाल दि. 10/2/2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले.
या निकालाबाबत बोलताना साखर उद्योगाचे ज्येष्ठ अभ्यासक पी. जी. मेढे म्हणाले कि, मुलाखतीत सहभागी झालेल्या सर्व ७३ उमेदवारांचे मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्र सरकारच्या मान्यतेने साखर आयुक्तालयाने सरकारी ठराव (GR) जारी करून कार्यकारी संचालक पॅनेलमध्ये सामील होण्यासाठी सज्ज झालेल्या पहिल्या ५० उमेदवारांचे मी विशेष अभिनंदन. २०२२ ते २०२५ पर्यंत चाललेल्या परीक्षा प्रक्रियेने आता एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ज्याचा शेवट न्यायालयीन प्रकरणांच्या निकालाच्या घोषणेत झाला आहे. परीक्षेत यशस्वी परीक्षार्थी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतील. सध्या आर्थिक आव्हानांना तोंड देणाऱ्या साखर उद्योगाला याचा नक्कीच फायदा होईल.