मुंबई : राज्यात कोविड १९च्या रुग्णसंख्येत कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. महाराष्ट्रात कोविडची स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतीपादन महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, राज्यात कोविडच्या स्थितीबाबत मंगळवारी सर्वेक्षण करण्यात आले. त्या दिवशी कोविड रुग्णसंख्या १३५ होती. तर ८५ रुग्ण फक्त मुंबईतील होते. मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यांना गरजेनुसार पावले उचलण्यास सांगितले आहे.
ते म्हणाले, कोविडच्या रुग्णांच्या संख्येत किरकोळ वाढ आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही. आम्ही लोकांना मास्क घालण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता आम्ही १२-१५ वयोगट आणि १५ ते १८ या वयोगटातील मुलांचे लसीकरण करत आहोत. आम्ही सातत्याने लोकांना आपले आणि आपल्या मुलांचे लसीकरण करण्यास प्रोत्साहन देत आहोत. बुस्टर डोसबाबत मंत्री टोपे म्हणाले की, डोस सध्या अनिवार्य नाही. मात्र, ज्यांना डोसची गरज आहे, ते खासगी हॉस्पिटलमध्ये जावून डोस घेऊ शकतात.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितले की, दैनिक रुग्णांच्या सकारात्मकतेचा दर ०.३१ टक्क्यांवरून ०.४९ टक्क्यांवर गेला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर ०.३४ टक्क्यांवरून ०.३८ टक्के झाला आहे. यांदरम्यान केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, वाढत्या सकारात्मकता दरामुळे आणि रुग्णसंख्येमुळे मंगळवारी हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र आणि मिझोरम या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून संक्रमणावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.