पुणे : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबरपासून २०२१-२२ या हंगामातील ऊस गाळपाला सुरुवात झाली आहे. या हंगामात उच्चांकी साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यासंदर्भात हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उच्चांकी साखर उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. गायकवाड म्हणाले की, या हंगामात ऊस लागवड क्षेत्र गेल्या गळीत हंगामात, २०२०-२१ मधील ११.४२ लाख हेक्टरवरुन वाढून १२.५ लाख हेक्टरवर पोहचले आहे. यावर्षीची ऊस उपलब्धता ही आजवरची सर्वोच्च ठरली आहे. महाराष्ट्रात यापूर्वी कधीही १२.५ लाख हेक्टरवर ऊस क्षेत्र पोहचले नव्हते. या पिकाची गुणवत्ताही चांगली आहे.
प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार या गळीत हंगामात आतापर्यंत १५५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू करण्यासाठी परवानगी मागितली होती. त्यापैकी १३१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. गायकवाड म्हणाले की आम्ही अशा साखर कारखान्यांना गाळप परवाना दिलेला नाही, ज्यांनी शंभर टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. महाराष्ट्रात आतापर्यंत १४ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात १३१ साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्यामध्ये ६२ सहकारी तर ६९ खासगी आहेत. आतापर्यंत ९७.७१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याने आतापर्यंत ९३.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सर्वसाधारण साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे.