पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 03 मार्च 2025 अखेर एकूण 200 साखर कारखाने सुरू असून या कारखान्यांनी 812.17 लाख टन उसाचे गाळप आणि 761.19 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा 9.37 टक्के आहे. राज्यात एकूण 92 साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. यामध्ये कोल्हापूर विभागातील 16, पुणे विभागातील 10, सोलापूर विभागातील 40, छत्रपती संभाजीनगर विभागातील 6, अहिल्यानगर विभागातील 10 तसेच नांदेड विभागातील 10 कारखान्यांचा समावेश आहे.मागील हंगामात याच काळात 207 साखर कारखाने सुरु झाले होते. यात 103 सहकारी तसेच 104 खाजगी कारखान्यांचा समावेश होता. या कारखान्यांनी 947.78 लाख टन उसाचे गाळप करून 951.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. राज्याचा एकूण सरासरी साखर उतारा 10.04 टक्के इतका होता. एकूण 36 साखर कारखान्यांनी गाळप हंगाम समाप्त केला होता.
कोल्हापूर विभागात 40 कारखान्यांनी 198.05 लाख टन उसाचे गाळप केले असून, 217.86 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 11 टक्के साखर उतारा आहे. विभागातील 16 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.पुणे विभागात 31 कारखान्याकडून 190.24 लाख टन उसाचे गाळप आणि 180.32 लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.48 टक्के आहे. विभागातील 10 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
सोलापुर विभागात 45 कारखान्यांनी 129.83 लाख टन उसाचे गाळप करून 105.18 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8.1 टक्के आहे. विभागातील 40 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे. अहिल्यानगर विभागात 26 कारखान्यांनी 108.15 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 94.79 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.76 टक्के आहे. या विभागातील 6 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखान्यांनी 78.28 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 61.91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाचा उतारा 7.91 टक्के आहे.या विभागातील 10 साखर कारखान्याचा गाळप हंगाम समाप्त झाला आहे.
नांदेड विभागात 29 कारखान्यांनी 94.56 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.59 टक्के साखर उताऱ्यासह 90.7 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागातील 10 साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे. अमरावती विभागात 4 साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले असून त्यात 1 सहकारी आणि 3 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 10.11 लाख टन उसाचे गाळप केले असून, 8.93 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.83 टक्के आहे. नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 2.95 लाख टन उसाचे गाळप करून 1.5 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.08 टक्के इतका आहे.