मुंबई : महाराष्ट्रातील सात लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी यंदाच्या मान्सूनच्या कालावधीत विमा कंपन्यांकडे फोन करुन मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना शेतांमध्ये जाऊन पाहणी करणे आणि नुकसानीचा आढावा घ्यावा लागेल. त्यानंतर ते अहवाल देतील, त्यानुसार शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकेल.
राज्य कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकीय अधिकारी विनयकुमार आवटे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, एक ऑगस्टपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर पावसाने पिकांचे नुकसान झाल्याचे एकूण २,५६,९८५ फोन आले आहेत. अशाच पद्धतीने फोन कॉलची संख्या एक सप्टेंबरपर्यंत वाढून ४,१५,७४७ इतकी झाली आहे. तर नऊ सप्टेंबरअखेर ५,५३,४९१ तक्रारी फोनवरुन दाखल झाल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत आलेल्या फोनकॉलनंतर या तक्रारी सात लाखांच्या पुढे पोहोचल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे आकडे आणखी वाढू शकतात. गेल्या आठवडाभरात आलेल्या फोन कॉलची माहिती अद्याप अडटेड झालेली नाही असे सूत्रांनी सांगितले, नुकसान झालेल्या पिकांशिवाय, शेतकऱ्यांनी जमिनीची धूप, जनावरांच्या गोठ्यांचे झालेले नुकसान आदींचीही माहिती दिली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात मराठवाडा विभागात गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांकडून येणाऱ्या फोन कॉल्सच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link