महाराष्ट्र : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत साखरेचे 134 लाख क्विंटल उत्पादन कमी

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात 16 फेब्रुवारी 2025 अखेर एकूण 200 साखर कारखाने सुरू असून या साखर कारखान्यांनी 739.46 लाख टन उसाचे गाळप केले असून आतापर्यंत 683.91 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे, असे साखर आयुक्तालयातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या अहवालातून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे 9.25 टक्के इतका आहे. राज्यातील 25 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. मागील वर्षी याच काळात 830.38 लाख टन उसाचे गाळप करून 817.99 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत तब्बल 134.08 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचा एकूण सरासरी साखर रिकव्हरी दर सुमारे 9.85 टक्के इतका होता. मागील वर्षी आतापर्यंत 9 कारखाने बंद झाले होते.

पुणे विभागात 172.56 लाख टन उसाचे गाळप झाले असून सरासरी साखर उत्पादन 160.37 लाख क्विंटल झाले आहे. साखरेचा उतारा सरासरी 9.29 टक्के आहे. विभागात 31 कारखाने कार्यरत असून त्यामध्ये 18 सहकारी आणि 13 कारखान्यांचा समावेश आहे. कोल्हापूर विभागात 40 कारखाने (26 सहकारी आणि 14 खाजगी) आहेत. या कारखान्यांनी 182.04 लाख टन उसाचे गाळप केले असून, 198.55 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागात राज्यातील सर्वाधिक 10.91 टक्के साखर उतारा आहे.

सोलापुरात 45 कारखाने कार्यरत असून यामध्ये 17 सहकारी आणि 28 खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 124.06 लाख टन उसाचे गाळप करून 99.3 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा 8 टक्के आहे. आतापर्यंत विभागातील 21 कारखाने बंद झाले आहेत. अहमदनगर विभागात 26 कारखाने कार्यरत असून त्यापैकी 14 सहकारी आणि 12 खाजगी आहेत. या कारखान्यांनी 95.38 लाख टन उसाचे गाळप केले आहे. एकूण 83.01 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून त्याचा उतारा 8.7 टक्के आहे.

नांदेडमध्ये 10 सहकारी आणि 19 खाजगी अशा एकूण 29 कारखान्यांनी 84.73 लाख टन उसाचे गाळप केले असून 9.45 टक्के साखर उताऱ्यासह 80.11 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागातील 4 कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 22 कारखान्यांनी (13 सहकारी आणि 9 खाजगी) 69.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यांनी 53.98 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या विभागाच उतारा 7.73 टक्के आहे.

अमरावती विभागात चार साखर कारखान्यांनी काम सुरू केले असून त्यात एक सहकारी आणि तीन खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांनी 8.47 लाख टन उसाचे गाळप केले असून, 7.33 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा उतारा 8.65 टक्के आहे. नागपूर विभागात 3 खाजगी कारखाने सुरु असून त्यांनी 2.4 लाख टन उसाचे गाळप करून 1.26 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा राज्यात सर्वात कमी 5.25 टक्के इतका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here