महाराष्ट्र : राज्यात २० फेब्रुवारीपर्यंत ३८ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, पुणे आणि अहिल्यानगरसह प्रमुख भागातील साखर कारखान्यांचे ऊस गाळप हळूहळू संपुष्टात येऊ लागले आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील कारखान्यांनी अद्याप गाळप थांबवलेले नाही.

याबाबत, साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, २० फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातील एकूण ३८ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. यामध्ये सोलापूरमधील २५ कारखाने, नांदेडमधील पाच, कोल्हापूरमधील चार, पुण्यातील तीन कारखाने आणि अहिल्यानगर परिसरातील एका कारखान्याचा समावेश आहे. गेल्या हंगामात याच काळात राज्यात फक्त ११ कारखाने बंद झाले होते. चालू हंगाम २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन ७०९.२३ लाख क्विंटल (सुमारे ७०.९२ लाख टन) झाले आहे, जे गेल्या हंगामातील याच कालावधीत उत्पादित झालेल्या ८५३.७१ लाख क्विंटलपेक्षा कमी आहे. सध्या १६२ कारखाने ऊस गाळप करीत आहेत., तर ३८ कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे.

राज्यातील कारखान्यांनी २० फेब्रुवारीपर्यंत ७६३.५३ लाख टन ऊस गाळप केला आहे. मागील हंगामातील समान कालावधीत ८६१.९१ लाख टन ऊस गाळप झाला होता. राज्याचा एकूण साखर उतारा ९.२९ टक्के आहे, जो गेल्या हंगामात याच कालावधीत मिळालेल्या ९.९ टक्के या दरापेक्षा कमी आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, कमी ऊस उत्पादन आणि वाढत्या गाळप क्षमतेमुळे हंगामात कारखान्यांनी लवकर कामकाज बंद केले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास झालेला उशीर, इथेनॉल उत्पादनाकडे ऊस वळवणे आणि उत्पादनातील घट यामुळे राज्यात साखर उत्पादन मागील हंगामाच्या तुलनेत कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here