गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये मुसळधार सुरू आहे. पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणखी काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यांदरम्यान, आज ५ ऑगस्ट रोजी हवामान खात्याने आठ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम, कन्नूर, कोझिकोड, वायनाड आणि कासारगोड या जिल्ह्यांमध्ये हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमध्ये गेल्या काही दिवसांत भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे १८ जणांना जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीदरम्यान राज्य सरकारने आतापर्यंत ४७ मदत शिबिरे उभारली आहेत. त्यामध्ये ७५७ हून अधिक लोकांना हलवण्यात आले आहे. जर २४ तासात २० सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास हवामान विभाग रेड अलर्ट जारी करतो. ६ सेमी ते २० सेमी पाऊस असेल तर ऑरेंज अलर्ट जारी केला जातो. आता हा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.