नवी दिल्ली : गुजरात आणि राजस्थानमध्ये हंगामी पावसाच्या सुरुवातीसह दक्षिण-पश्चिम मान्सून संपूर्ण देशभरात पोहोचला आहे. सतत पडणाऱ्या पावसाने लोकांना उकाड्यापासून दिलासा मिळवून दिला आहे. आसाम आणि बिहारमध्ये पूरस्थिती आहे. तर दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, गुजरातमध्ये पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितले की, ८ जुलै रोजी सामान्य स्थितीमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून देशभरात पसरला आहे. कृषी आधारित अर्थव्यवस्था अद्याप मान्सूनची संथ गती पाहात आहे. देशात ८ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यात देशाच चांगला पाऊस होऊल असे अनुमान भारतीय हवामान विभागाने वर्तविले आहे.
वेबदुनिया डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, दिल्ली, गुजरात, मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागात चांगला पाऊस झाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, बिहार, गुजरातमध्ये आणखी तीन दिवस जोरदार पाऊस कोसळेल अशी शक्यता आहे. दुसरीकडे आसाममध्ये रविवारी स्थिती काहीशी सुधारला आहे. मात्र, आताही २६ जिल्ह्यांतील १८ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. बाजाली, बारपेटा, विश्वनाथ, कच्छार, चिरांग, दरांग, धेमाजी, डिब्रुगड, आदींसह १६१८ गावे पुराच्या विळख्यात आहेत. सरकारकडून मदतकार्य गतीने सुरू असल्याचे सांगण्यात आले.