नाशिक : स्पायका ग्रीन एनर्जी अँड ॲग्रो प्रा. लि. संचलित एस. जे. शुगर रावळगाव साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता शेतकरी संघटनेचे नेते शेखर पवार यांच्या हस्ते गव्हाण व शेवटच्या ऊस भरलेल्या गाड्यांचे पूजन करून झाली. रावळगाव कारखान्यामुळे गाव व परिसरातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. कारखान्याने उसाला चांगला दर दिल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. कारखान्यान्र यंदाच्या हंगामात ११४७२४.०१२ टन उसाचे गाळप करून १०९९९५ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. एकूण रिकव्हरी ९.५४ टक्के इतकी मिळाली आहे.
पवार म्हणाले, अध्यक्ष बबनराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी रावळगाव कारखाना पुन्हा ताकदीने सुरू केल्यानंतर या भागाला ऊस शेतीत पुन्हा नवी दिशा मिळाली आहे. विविध अडचणींवर मात करत कारखान्याने गेल्या वषपिक्षा या वर्षी अधिक उसाचे गाळप केले.ऊस लागवडीसाठी शेतकरी मेळावे घेतले जात आहेत. शेतकऱ्यांना उसाचे बेणे वाटप सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी एकूण क्षेत्रापैकी २५ टक्के क्षेत्रावर ऊस लागवड करावी, असे आवाहन करण्यात आले. ऊस वाहतूक करणाऱ्यांना व महिलांना शेखर पवार, कारखान्याचे अध्यक्ष बबनराव गायकवाड, उपाध्यक्ष नानासाहेब आंबेकर, संचालक कुंदन चव्हाण आदींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. उन्मय चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. कुंदन चव्हाण यांनी आभार मानले. सरव्यवस्थापक बी. एन. पवार उपस्थित होते.