कोल्हापूर : राजगोळी खुर्द येथील ओलम (हेमरस) साखर कारखान्याच्यावतीने गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाला प्रती टन २५० ग्रॅमप्रमाणे साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी ही माहिती दिली. लवकरच साखर वाटपाचे काम सुरू होईल. तसेच एक नोव्हेंबरपासून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भरत कुंडल म्हणाले की, ओलम कारखान्याने जास्तीत जास्त दर देऊन शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. कारखान्याने प्रत्येक वर्षी गडहिंग्लज विभागात उच्चांकी ऊस दर दिला आहे. यंदाचा दरही उच्चांकी असेल. कारखान्याची तांत्रिक कामे पूर्ण झाल्याने शेती विभागामार्फत शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन ऊस तोडणीबाबत माहिती दिली जात आहे. कुंडल म्हणाले की, कारखान्याकडे २५ हजार शेतकऱ्यांच्या उसाची नोंद झाली आहे. लवकरच ऊसदरही जाहीर करू.ऊसदराबाबत शेतकऱ्यांनी काळजी करू नये. नेहमीप्रमाणे दर पंधरा दिवसात उसाची बिले आदा केली जातील. यावेळी अनिल पाटील, नीता निबोरे उपस्थित होते.