नवी दिल्ली : शहरांपासून लांब, ग्रामीण भागात राहाणाऱ्या गरीब, गरजू लोकांसाठी सरकारकडून अनेक योजना चालविल्या जातात. आरोग्य, पेन्शन, रेशन, घर, रोजगार, शिक्षण अशा अनेक लाभदायक आणि कल्याणकारी योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठीही पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी प्रत्येकी २००० रुपयांचा हप्ता दिला जातो. वार्षिक ६ हजार रुपये या योजनेतून मिळतात. आतापर्यंत १२ हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. आता १३ व्या हप्ताची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जर शेतकरी या हप्त्याचा लाभ घेवू इच्छित असतील तर त्यांना दोन महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील. जर असे केले नाही, तर हप्ता रखडू शकतो. या महिन्याच्या अखेरीस योजनेचा १३ वा हप्ता देण्याचा विचार सरकार करीत आहे. जर तुम्हाला योजनेचा हप्ता रखडू नये असे वाटत असेल तर त्वरीत ई – केवायसी करण्याची गरज आहे. प्रत्येक लाभार्थ्यासाठी हे अनिवार्य आहे. याबाबत पीएम किसान पोर्टलने दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावून ओटीपी बेस्ड ई केवायसी अनिवार्य आहे. सीएससी सेंटरमध्येही ही ईकेवायसी करणे शक्य आहे. याशिवाय लाभार्थ्यांना जमीन पडताळणी करणे आवश्यक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.