म्हैसूर : जिल्ह्यात वन विभागाने टी. नरसीपूर तालुक्यात बिबट्याची दहशत असलेल्या २३ गावांमधील ऊस तोडणी प्राधान्याने करण्याची मागणी केली आहे. या उपाययोजनांना प्राधान्य देण्याबाबत उपायुक्त के. व्ही. राजेंद्र यांना माहिती देण्यात आली. कारण, टी. नरसीपूरमध्ये कृषी क्षेत्रातील ऊसाची शेते ही बिबट्यांच्या प्रजननासाठी आणि आसरा घेण्यासाठी अधिक उपयुक्त ठरली आहेत. तालुक्यामध्ये गेल्या ३० दिवसांत बिबट्याकडून दोन मुलांची हत्या केल्याचा प्रकार घडल्यानंतर तातडीने ऊस तोडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांच्या हत्येनंतर मोठ्या प्रमाणावर बिबट्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये १२० वन विभागाचे कर्मचारी सहभागी आहेत.
याबाबत म्हैसूर सर्कलच्या मुख्य वन संरक्षक मालती प्रिया यांनी सांगितले की, त्यांनी तालुक्यातील २३ अशा गावांचे मॅपिंग केले आहे, की ज्यामध्ये बिबट्यांचे सर्वाधिक वास्तव्य दिसून आले आहे. यामध्ये केबेहुंडी आणि एम. एल. हुंडी या दोन गावांचा समावेश आहे, जी १२ किलोमीटर दूर आहेत आणि तेथे दोन मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मालती प्रिया यांनी सांगितले की बिबट्यांनी स्वतःला ऊस शेतांमध्ये सुरक्षित लपवून ठेवले आहे. त्या म्हणाल्या की, जर ऊसाची तोडणी लवकर केली गेली तर बिबट्या तेथे लपण्याची शक्यता कमी आहे. आणि मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी होईल.