रुडकी : भारतीय किसान युनियनच्या प्रतीनिधीमंडळाने उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. याबाबत शेतकऱ्यांनी विविध तीन मागण्यांचे निवेदन देऊन ते प्रश्न सोडविण्याची मागणी केली. उप जिल्हाधिकाऱ्यांनी लक्सर ऊस समितीच्या प्रभारी सचिवाना या मागण्यांची सोडवणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.
भारतीय किसान युनियन अम्बावताचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सहदीप सिंह यांच्यासोबत एका शिष्टमंडळाने गुरुवारी उप जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा केली. लक्सर ऊस समितीशी जवळपास ४५ हजार शेतकरी संलग्न असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना हंगामात जास्तीत जास्त दहा तोडणी पावत्या दिल्या जातात. समितीकडून पंधरवड्यातील एक पावती दिली जाते. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीची प्रक्रीया रेंगाळते. शेतकऱ्यांची गैरसोय होते. छोट्या शेतकऱ्यांना एक ते दोन पंधरवड्याच्या कालावधीत सर्व पावत्या देण्याची गरज आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी वारसा हक्काच्या आधारावर समितीचे सदस्य झालेल्यांबाबतही प्रश्न मांडले. लक्सर समितीच्या पावत्यांची छपाई ज्वालापूरमध्ये केल्याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लक्सरच्या पावत्या पूर्वीप्रमाणे लक्सर समितीतही छापल्या जाव्यात अशी मागणी केली. विविध तीन मागण्यांचे निवेदन यावेळी उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.