अहमदनगर : पारनेर सहकारी कारखान्याची काही मालमत्ता क्रांती शुगरला हस्तांतरण करताना झालेल्या करारात कोणतेही परवाने हस्तांतरण झालेले नाहीत. मात्र क्रांती शुगरने सात वर्षांपासून पारनेर कारखान्याच्या संमतीविना केंद्रीय औद्योगिक परवाना वापरला आहे. ‘क्रांती शुगर’ने उभारलेल्या नवीन युनिटसाठीही हाच परवाना वापरला असून ही बाब बेकायदा आहे. म्हणून यावर्षीचा गाळप परवाना क्रांती शुगर यांना देण्यात येऊ नये, यापूर्वीच्या परवान्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पारनेर कारखाना बचाव समितीच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांकडे केली आहे.
पारनेर कारखाना बचाव व पुनरुज्जीवन समितीने एका पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीमध्ये म्हटले की, देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता पुण्याच्या क्रांती शुगर कंपनीने घेतली. राज्य सहकारी बँकेने २०१५ ला साखर कारखान्याचे खासगीकरण केले. पुण्यातील क्रांती शुगर कंपनीला तो विकला. क्रांती शुगरने सात गाळप हंगाम घेतले. मात्र, कारखान्याची मालमत्ता बेकायदा अदलाबदल प्रकरणी पारनेर कारखान्याच्या बाजूने लागला आहे. राज्य शासनाच्या या निकाला विरोधात क्रांती शुगरने उच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे यंदा परत गाळप परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांना देण्यात आला आहे.