मुंबई : महाराष्ट्रात बुधवारपासून पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) विविध जिल्ह्यांना रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. आयएमडीने रायगड, रत्नागिरी, सातारा आणि कोल्हापूरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबईसह पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, पुढील चार दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळेल. मुंबईत ८ जुलैपर्यंत पावसाची शक्यता आहे. ६ ते ८ जुलै यांदरम्यान, मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. ९ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळू शकतो. मुंबईत बुधवारी कमाल तापमान २७ तर किमान तापमान २५ डिग्री सेल्सिअस राहील. ढगाळ हवामान आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक स्थितीत असेल. पुण्याचे कमाल तापमान २७ तर किमान तापमान २२ डिग्री सेल्सिअस राहिल. येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. हवेची गुणवत्ता समाधानकारक स्थिती राहील. नागपूरमध्ये कमाल ३१ आणि किमान २३ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिकमध्ये कमाल २९ तर किमान २२ डिग्री सेल्सिअस तापमान राहील. हलका पाऊस कोसळेल. तर औरंगाबादमध्ये कमाल ३२ आणि किमान २२ डिग्री सेल्सिअस तापमानाचे अनुमान आहे. पावसाच्या मध्यम सरी कोसळतील.