बरेली : हवामानाचा मूड पुन्हा बदलला आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह दक्षिणेच्या विविध भागात हलका पाऊस झाला. उत्तर प्रदेशातील झाशीसह अनेक जिल्ह्यांमध्येही गारपीट झाली. देशात आगामी तीन दिवस पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. युपीच्या बाराबंकीमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू झाला. तर कुशीनगर येथे वीज पडल्याने तिघे भाजले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उत्तर प्रदेशात पावसासोबत जोरदार वारा होता, त्यात पाऊस, गारपीटने पिकांचे नुकसान झाले. गव्हाचे पीक खराब झाले तर, मोहरी फुटली. दुसरीकडे बटाट्याचे फारसे नुकसान झाले नसले तरी बटाटे काढणीवर निश्चितच परिणाम झाला. हवामान खात्याने आणखी पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषत: २० आणि २१ मार्च रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढचा आठवडा शेतकऱ्यांसाठी अडचणीचा असणार आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्याचवेळी जोरदार वाराही वाहत होता. पावसाने पक्व झालेल्या गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले.
सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पीक कोमेजले. दुसरीकडे, पाऊस आणि वारा या दोन्हीमुळे मोहरीचे नुकसान होते. आता बटाटा उत्पादक शेतकरीही तितकाच चिंतेत आहे. या पावसामुळे आंब्याचा मोहोर गळून पडला. पश्चिम आणि मध्य उत्तर प्रदेशात अधिक पाऊस झाला. आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पुढील पाच दिवसात मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, शामली, हापूर, नोएडा, अलीगढ, गाझियाबाद, रामपूर, बिजनौरमध्ये हलका पाऊस अपेक्षित आहे. तर बदाऊं, संभल, फारुखाबाद, सहारनपूरमध्ये मध्यम पाऊस आणि बरेली, पिलीभीतमध्ये मध्यम मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.