भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीनंतर रेपो रेटमध्ये वाढ करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.५० टक्के दरवाढ केली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रेपो रेटमध्ये ५० बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली होती. मे महिन्यातही एमपीसीच्या बैठकीत रेपो पेटमध्ये ५० बेसीस पॉईंट वाढ करून हा दर ४.९० टक्क्यांवर आणण्यात आला होता.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, रेपो रेट वाढल्याने आता सर्व कर्जे महागणार आहेत. रेपो रेटच्या दरानुसार आरबीआय दुसऱ्या बँकांना कर्ज पुरवठा करते. आरबीआयने जर रेपो रेट घटवला तर कर्जांचे व्याजदर स्वस्त होतात. जेव्हा आरबीआय रेपो रेट वाढवते तेव्हा व्याज दरात वाढ केली जाते. त्यामुळे आता सामान्य नागरिकांना मिळणाऱ्या कर्ज दरात वाढ होणार आहे. जर एखाद्याने फिक्स्ड व्याज दरावर कर्ज घेतले असेल तर त्या ग्राहकांसाठी हे चिंतेचे कारण नाही. कारण त्यांच्या व्याज दरावर फरक पडणार नाही. केंद्रीय बँकेने ही दरवाढ लगेच लागू होत असल्याचे म्हटले आहे. महागाईला आळा घालण्यासाठीच्या उपायांनुसार ही वाढ करण्यात आली आहे असे सांगण्यात आले.