सांगली : टेंभू उपसा सिंचन योजना सुरळीत ठेवण्याकरिता लाभक्षेत्रातील सर्व साखर कारखान्यांनी सर्वच लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात करावी. ज्या लाभधारकांनी कारखान्यांकडे पाणीपट्टी जमा केली आहे, त्यांची व कपात केलेली पाणीपट्टी जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापनाच्या ओलगेवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी केले आहे. २ जानेवारी रोजी सांगली येथे पाटबंधारे मंडळाच्या बैठकीत सर्व साखर कारखान्यांचे संचालक, अध्यक्षांच्या समवेत आढावा बैठक झाली. यामध्ये काही लाभधारक पाणीपट्टी न भरता ते लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस घालवतात, ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे.
टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी अंतर्गत टेंभू प्रकल्प, आरफळ कालवा, कृष्णा कालवा, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प या सर्व प्रकल्पाच्या सिंचन वर्ष २०२३-२४ मधील खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याची पाणीपट्टी कपात ही कारखान्यांमार्फत केली जाते. याबाबत जारी केलेल्या निवेदनात प्रकल्प व्यवस्थापनांतर्गत लाभधारकांच्या ऊस क्षेत्राची पाणीपट्टी कपात करून शासकीय महसूल अंतर्गत जमा करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही लाभधारक पाणीपट्टी न भरता लाभक्षेत्राबाहेरील साखर कारखान्यांना गाळपासाठी ऊस देत असल्यास त्यांची पाणीपट्टी आकारणी करण्यात येऊन त्यांचे ७/१२ वर महसूल खात्यामार्फत बोजा नोंद चढवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.