पुणे : महाराष्ट्रात, हंगाम २०२४-२५ मध्ये सहभागी झालेल्या २०० साखर कारखान्यांपैकी सध्या फक्त १८ साखर कारखाने ऊस गाळप करत आहेत. कोल्हापूर, सोलापूर आणि अमरावती या विभागातील सर्व कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, २३ मार्चपर्यंत महाराष्ट्रातील एकूण १८२ साखर कारखान्यांनी कामकाज बंद केले आहे. यामध्ये सोलापूरमधील ४५, कोल्हापूरमधील ४० कारखाने, पुण्यातील २६ कारखाने, नांदेडमधील २५ कारखाने, छत्रपती संभाजीनगरमधील २१ कारखाने, अहिल्यानगरमधील २२ कारखाने आणि अमरावती प्रदेशातील ३ कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात याच काळात राज्यात १४१ कारखाने बंद झालो होते.
हंगाम २०२४-२५ मध्ये महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन ७९७.४८ लाख क्विंटल (सुमारे ७९.७४ लाख टन) झाले आहे. गेल्या हंगामातील समान कालावधीत उत्पादित झालेल्या १०६७.५ लाख क्विंटलपेक्षा ते कमी आहे. २३ मार्चपर्यंत, राज्यातील कारखान्यांनी ८४३.३३ लाख टन ऊस गाळप केले आहे, तर गेल्या हंगामात याच कालावधीत १०४६.५८ लाख टन ऊस गाळप झाला होता. राज्याचा एकूण साखर उतारा दर ९.४६ टक्के आहे, जो गेल्या हंगामातील समान कालावधीमधील १०.२ टक्के उताऱ्यापेक्षा कमी आहे. उद्योग तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कमी उत्पादन आणि वाढत्या गाळप क्षमतेमुळे या हंगामात कारखान्यांनी लवकर कामकाज बंद केले आहे. गाळप हंगाम सुरू होण्यास उशीर, इथेनॉल उत्पादनासाठी साखरेचा वापर आणि कमी उत्पादन यामुळे राज्यात साखर उत्पादन गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी झाले आहे