नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भयानक उष्णतेला तोंड देत असलेल्या दिल्ली-एनसीआरसह अनेक भागातील लोकांसाठी दिलासादायक वृत्त आहे. हिमालयाकडून आलेल्या पश्चिमी वादळामुळे हवामानात बदल होताना दिसून येत आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्रचंड उकाडा, उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळू शकतो. दिल्लीत आज कमाल तापमान ४० डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी राहील. बिहारच्या काही जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. आज दिल्लीसह काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. मात्र, उकाड्यापासून फारशी सुटका होणार नाही.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमधील काही भागात बदल झाला आहे. हलक्या पावसाची शक्यता आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये हीटवेव्ह अर्लट जारी केला आहे. यासोबतच आणखी काही जिल्ह्यांत यलो अर्लट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये २५ एप्रिलपर्यंत अशीच स्थिती राहील. झारखंडची राजधानी रांचीमध्ये ढगाळ वातावरण आहे. उत्तर प्रदेशात बदल होऊ शकतो. राज्यात उष्णतेच्या लाटेने लोक हवालदिल आहेत. अशात हलका पाऊस लोकांना मोठा दिलासा देईल. पंजाब, हरियाणात हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.