नवी दिल्ली : अनेक साखर कारखानदारांनी गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय किंमतीमधील ५ ते ६ टक्के वाढीपूर्वी, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये निर्यात करार केले होते. मात्र, आता ते साखरेच्या वधारलेल्या किमतींचा लाभ घेण्यासाठी आपल्या निर्यातीची वचनबद्धता, जबाबदारी टाळू पाहात आहेत, असा आरोप साखर निर्यातदार व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे अनेक निर्यातदारांना करार डिफॉल्ट होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागत आहे.
दि इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुणेस्थित बारामती ॲग्रो लिमिटेडचे अध्यक्ष (व्यापार) सत्यजीत जगताप यांनी सांगितले की, साखर निर्यातदारांना महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून निर्यात वचनद्धतेबाबत मोठ्या प्रमाणात आव्हानांचा सामना करावा लागत आहे. जागतिक बाजारपेठेत देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब चांगली नाही. भारतीय निर्यातदारांनी ऑगस्टपासून साखर निर्यातीचे करार करण्यास सुरुवात केली होती. या आठवड्याच्या अखेरीस सरकारकडून २०२२-२३ साठी आपले निर्यात धोरण जाहीर करण्यापूर्वी कारखानदारांनी निर्यातदारांसोबत कच्ची साखर व मध्यम ग्रेडची साखर ३,२३०० ते ३,५०० रुपये प्रती क्विंटल या दराने विक्री करण्याचे करार केले आहेत.