फगवाडा : गेल्या तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने संतप्त झालेल्या फगवाडा साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी कारखाना प्रशासनावर जोरदार टीका करीत निदर्शने केली. साखर कारखाना कामगार संघाचे नेते सुखदेव सिंह यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे.
दी प्रिंटमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यापासून पगार न मिळाल्याने आमच्या कुटुंबांची स्थिती बिकट झाली आहे. आम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी फी भरणेही मुश्किल झाले आहे. कारखान्याचे मालक परदेशात पळून गेले आहेत. स्थानिक अधिकारी आम्हाला खोटी आश्वासने देत आहेत. आगामी सणासुदीचा कालावधी लक्षात घेवून किमान एक महिन्याचा पगार दिला जावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी कामगारांनी दिला.