कायमगंज : सहकारी साखर कारखान्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यानंतर हंगाम समाप्तीची घोषणा केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखाना १६ दिवस जादा सुरू राहिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १.८० लाख क्विंटल अधिक उसाचे गाळप झाले आहे. दि किसान सहकारी साखर कारखान्याचे सर व्यवस्थापक किशनलाल यांनी सांगितले की, कारखाना बंद होणार असल्याची नोटीस जारी केल्यानंतर गेले आठवडाभर ऊसाची आवक कमी झाली होती. त्यामुळे अनेकवेळा कारखाना थांबून थांबून चालवावा लागत होता. सोमवारी उपलब्ध उसाच्या गाळपानंतर गळीत हंगामाचे सत्र समाप्त करण्यात आले.
याबाबत जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सरव्यवस्थापकांनी सांगितले की, गेल्या वर्षी कारखान्याने ११५ दिवस ऊस गाळप केले होते. तर यंदा १३१ दिवसांचे गाळप करण्यात आले आहे. गेल्या वर्षी १२.२३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले होते. तर यंदा १४.१३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. साखर उत्पादनाबाबत आगामी चार दिवसांत स्पष्टता होईल. सोमवारी झालेल्या गाळपानंतर साखर उत्पादनाची प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याचे सीसीओ प्रमोद यादव यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस क्षेत्र वाढले होते. त्यामुळे ऊस उत्पादनातही वाढ झाली. गेल्यावर्षी ४३.७२ हेक्टर ऊस क्षेत्र होते. ते यंदा ५१.१८ हेक्टर झाले आहे. त्यामुळे कारखान्याला अधिक प्रमाणात ऊस मिळाला.