साखर कारखान्यांनी व्याजासह ऊसाच्या एफआरपीची थकबाकी द्यावी : राजू शेट्टी

कोल्हापूर : महाराष्ट्रातील गाळप हंगाम जवळपास समाप्त होण्याच्या मार्गावर असला तरी अनेक साखर कारखान्यांनी आतापर्यंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य आणि लाभदायी दर (एफआरपी) दिलेला नाही, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. शेट्टी यांनी मंगळवारी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. त्यांनी गायकवाड यांना सांगितले की, शेतकऱ्यांना दोन महिने उशीरा ऊस बिले मिळत आहेत. साखर कारखाने अधिकाधिक इथेनॉल उत्पादन करून लाभ मिळवत आहेत. आणि साखर दरातील स्थिरतेचाही फायदा मिळवत आहेत, असा दावा त्यांनी केला.

शेट्टी म्हणाले की, ऊस नियंत्रण कायद्यानुसार, ऊसाचे गाळप केल्यानंतर १५ दिवसांत एफआरपी देणे अनिवार्य आहे. आयुक्तांनी याबाबत दोषी आढळणाऱ्या कारखान्यांना नोटीस जारी करून त्यांच्याविरोधात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. यासोबतच शेतकऱ्यांना प्रलंबित कालावधीसाठी बिलांवरील व्याजही मिळाले पाहिजे. साखर आयुक्त कार्यालयाने सांगितले की, एफआरपीपैकी ९२ टक्के रक्कमेची बिले अदा करण्यात आली आहेत. केवळ ८ टक्के ऊस बिले प्रलंबित आहेत. चालू गळीत हंगामात आतापर्यंत १०४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आता फक्त ५५ कारखान्यांकडून गाळप सुरू आहे. गाळप बंद करणाऱ्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना बिले दिलेली नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here