महाराष्ट्रातील ऊस हंगाम हळूहळू अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मात्र, राज्यात आतापर्यंत एकही साखर कारखान्याचे गाळप बंद झालेला नाही.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ८३७.३७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ८५२.७५ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.१८ टक्के आहे.
महाराष्ट्रातील साखर उताऱ्याचा विचार केला तर कोल्हापूर विभाग अग्रेसर आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत कोल्हापूर विभागात १९७.५७ लाख टन ऊसाचे गाळप झाले आहे तर २२९.५६ लाख क्विंटल साखर उत्पादन आले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. येथील साखर उतारा ११.६२ टक्के झाला आहे.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४६ साखर कारखान्यांनी गळीत हंगामात भाग घेतला आहे. येथे १४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १९८.२३ लाख टन उसाचे गाळप करून १८१.६१ लाख क्विंटल साखर उत्पादन करण्यात आले आहे.