महाराष्ट्रात साखर उत्पादनात तब्बल २५ टक्क्यांची घट, देशाचीही स्थिती बिकट

नवी दिल्ली : देशातील साखर उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्रातही अशीच स्थिती आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यात साखरेचे उत्पादन ७९.७४ लाख टन झाले आहे. गेल्या हंगामात हे प्रमाण १०६.७५ लाख टन होते. याचा अर्थ असा की यावर्षी महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन सुमारे २५ टक्क्यांनी कमी झाले आहे. चालू हंगाम १०० दिवसांपेक्षा कमी काळ चालेल अशी शक्यता असल्याने साखर कारखान्यांवर मोठा आर्थिक ताण येणार आहे.

कृषकजगतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, राज्यातील २०० साखर कारखान्यांपैकी १८२ साखर कारखाने बंद झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा २०२४-२५ चा साखर गाळप हंगाम संपत आला आहे. गाळप हंगाम उशिरा सुरू होणे, इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा वापर आणि उसाच्या उत्पादनात घट ही साखर उत्पादनात घट होण्याचे मुख्य कारणे आहेत. साखर आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील साखर कारखान्यांनी आतापर्यंत ८४३.३३ लाख टन ऊस गाळप केला आहे, ज्याचा सरासरी साखर उतारा ९.४६ टक्के आहे. गेल्यावर्षी, कारखान्यांनी १०.२ टक्के उच्च उताऱ्यासह १०४६.५८ लाख टन ऊस गाळप केले होते. साखर उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, उर्वरित साखर कारखानेदेखील लवकरच त्यांचे काम थांबवतील. खरेतर राज्यात दरवर्षी गाळप हंगाम ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होतो आणि मार्च किंवा एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत म्हणजेच सुमारे १४० ते १५० दिवस चालतो. तर यावर्षी हंगाम नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू होऊ शकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here