हापुड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २७४ कोटी रुपये न दिल्याबद्दल बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना सकाळी दहा वाजल्याासून तब्बल दहा तास जिल्हाधिकारी कार्यालयात बसवून ठेवले. रात्री आठ वाजता कारखाना प्रशासनाने आगामी दोन दिवसांत ९ कोटी रुपयांची ऊस बिले अदा करण्याचे आणि लवकरच सर्व थकबाकी देण्याचे आश्वासन दिले. आता दोन दिवसानंतर जिल्हाधिकारी पु्न्हा या अधिकाऱ्यांकडे आढावा घेणार आहेत. दरम्यान, भाकियूच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांसमोर ऊस थकबाकीचा मुद्दा मांडला होता.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यातील दोन्ही कारखाने ऊस बिले देण्यात पिछाडीवर आहेत. गेल्या काही वर्षापासून अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यावर ५० कोटी रुपयांची ऊस बिले देण्याचे आश्वासन दिले गेले. प्रत्यक्षात काहीच बिले दिलेली नाहीत. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी भाकियूचे जिल्हाध्यक्ष दिशेन खेडा यांनी ऊस बिलांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर बुधवारी जिल्हाधिकारी मेधा रुपम यांनी दोन्ही कारखान्याचे ऊस अधिकारी, सीएफओंना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवून तत्काळ ऊस बिले देण्याचे आदेश दिले. सलग दहा तास अधिकाऱ्यांना बसवून ठेवले. रात्री नऊ कोटी रुपये दोन दिवसांत देण्याच्या आश्वासनानंतर अधिकाऱ्यांना सोडण्यात आले.