देवरिया : योगी सरकारच्या काळात नव्या साखर कारखान्यांची स्थापना केली जात आहे. आणि साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. परिवारवाद करणाऱ्यांच्या कार्यकाळात कारखाने बंद होते अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देवरिया येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते. देवरीयातील आमचे ऊस उत्पादक शेतकरी कधीही विसरु शकत नाहीत. त्यांना आपला ऊस दलालांना विकावा लागत होता. उसाच्या तोडणी पावतीसाठी त्यांना मारहाणही सहन करावी लागत होती. अपमान सहन करावा लागत होता. ऊस उत्पादकांचे उत्पन्न वाढीसाठी इथेनॉल मिश्रणाला गती मिळाली आहे असे पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी परिवारवादाच्या मुद्यावर विरोधकांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या वेळची विधानसभा निवडणूक ही परिवारवादी आणि राष्ट्रवादी अशा गटांमध्ये आहे. या निवडणुकीत दलित, शोषीत, मागास आणि सामान्य वर्ग परिवारवाद्यांच्या विरोधात एकजूट आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यात ६१ मतदारसंघात निवडणूक होत आहे. राज्यातील पूर्व क्षेत्रातील हे मतदारसंघ आहेत. १२ जिल्ह्यातील ६१ विधानसभा मतदारसंघात रायबरेली, अमेठी, सुल्तानपूर, चित्रकूट, प्रतापगड, प्रयागराज, अयोध्या, गोंडा यांचा समावेश आहे. पाचव्या टप्प्यात ६९२ उमेदवार आहेत. उर्वरीत दोन टप्प्यात ३ आणि ७ मार्च रोजी मतदान होईल. मतांची मोजणी १० मार्च रोजी होईल.