नवी दिल्ली : त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा भारत सरकारचा निर्णय हा ऐतिहासिक, दूरगामी, नव्या युगाची सुरूवात करणारा तसेच सहकारी क्षेत्राला बळकटी देणारा असून ही दूरदृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दाखविल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने त्यांची प्रशंसा केली आहे.
“त्रिभुवन सहकारी विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय भारतातील सहकारी चळवळीसाठी नव्या युगाची सुरुवात आणि एक परिवर्तन घडवून आणणारा पाऊल आहे. हे विद्यापीठ ज्ञानकेंद्र म्हणून काम करेल, व्यावसायिकांना तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल आणि त्यामुळे सहकारी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्याने सुसज्ज करेल, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
त्रिभुवन सहकारी विद्यापीठाच्या स्थापनेच्या निर्णयाने कौशल्यातील कमतरता दूर करण्यास चालना मिळेल, विशेष सहकारी अभ्यासक्रम सुरू करण्यास आणि देशभरातील २८४ हून अधिक प्रशिक्षण संस्थांना बळकटी देण्यास मदत करेल,असा विश्वास राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला आहे.