मोतीहारी : राज्यातील साखर उद्योगांचे व्यवस्थापन आणि मठ, मंदिरांचे उत्पन्न याबाबत राज्य सरकार पुन्हा एकदा आढावा घेणार आहे, अशी माहिती ऊस व ऊद्योग, कायदा मंत्री प्रमोद कुमार यांनी दिली. याबाबत महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेले साखर कारखाने आणि मठ, मंदिरातील व्यवस्था आदर्श मानून काम करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. तेथे जी व्यवस्था सर्वोत्तम आहे, ती लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. महाराष्ट्रातील साखर कारखाने व मठ, मंदिरांबाबत पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावरून परतल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
याबाबत जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, मंत्र्यांनी सांगितले की, आपल्या पाच दिवसीय दौऱ्यामध्ये त्यांना साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हिताकडे अदिक लक्ष देऊन दीर्घकाळ चालवले जात असल्याचे आढळले. मात्र, आपल्याकडील कारखाने काही दिवसांच्या हंगामानंतर बंद होतात. आपल्याकडीक कारखान्यांचे मालक फक्त आपला फायदा पाहतात, तर महाराष्ट्रातील कारखान्यांचे मालक शेतकऱ्यांच्या हिताकडेही लक्ष देतात. महाराष्ट्रातील कारखान्यांमध्ये शेतकऱ्यांचीही चांगली भागिदारी असते. तेथील को-ऑपरेटिव्ह व्यवस्था खूप चांगली आहे. आपल्याकडे कारखान्यांमध्ये मध्यस्तांचा वरचष्मा असल्याच्या तक्रारी येतात. मात्र, तेथे अशी पद्धत नाही. ऊस उत्पादन केल्यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांना आपला ऊस न्यावा यासाठी साखर कारखान्यांकडे चकरा माराव्या लागत नाहीत, असे मंत्री प्रमोद कुमार म्हणाले. यावेळी ऊस विभागाचे आयुक्त गिरिवर दयाल सिंह, केव्हीएन सिंह व उपजिल्हाधिकारी सुनील कुमार आदी उपस्थित होते.