पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत सरकार आणि चिली सरकार यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मंजुरी दिली आहे.
या सामंजस्य करारामध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रात सहकार्याची तरतूद आहे. आधुनिक शेतीच्या विकासासाठी कृषी धोरणे, सेंद्रिय उत्पादनांचा द्विपक्षीय व्यापार सुलभ करण्यासाठी सेंद्रिय शेती, तसेच दोन्ही देशांमध्ये सेंद्रिय उत्पादन विकसित करण्याच्या उद्देशाने धोरणांच्या आदानप्रदानाला प्रोत्साहन , भारतीय संस्था आणि चिलीच्या संस्थांदरम्यान कृषी क्षेत्रातील नवोन्मेषला प्रोत्साहन तसेच समान आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्यासाठी संभाव्य भागीदारीबाबत विज्ञान आणि नवोन्मेष ही सहकार्याची प्रमुख क्षेत्रे निवडली आहेत.
या सामंजस्य कराराअंतर्गत, चिली-भारत कृषी कार्य गट स्थापन केला जाईल, जो या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीवर देखरेख , आढावा आणि मूल्यांकन करण्यासाठी तसेच नियमित संवाद आणि समन्वय स्थापित करण्यासाठी जबाबदार असेल.
कृषी कार्यगटाच्या बैठका वर्षातून एकदा चिली आणि भारतात आलटून पालटून आयोजित केल्या जातील. सामंजस्य करारावर स्वाक्षरीनंतर तो अंमलात येईल आणि अंमलात आल्याच्या तारखेपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील आणि त्यानंतर आणखी 5 वर्षांच्या कालावधीसाठी त्याचे स्वयंचलितपणे नूतनीकरण केले जाईल.
(Source: PIB)