नवी दिल्ली: अन्न प्रक्रिया उद्योगाचा सध्याचा दृष्टीकोन आणि लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत उद्योगाच्या गरजांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या अध्यक्षतेखाली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) आणि त्याच्या सदस्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्र्यांचे फिक्कीचे सरचिटणीस दिलीप चेनॉय यांनी स्वागत केले आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून अन्न उद्योगाला सातत्याने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले.
कोविड १९ चा प्रसार रोखण्यासंबंधी उपाययोजनांशी कोणतीही तडजोड न करता पूर्ण क्षमतेने उद्योग क्षेत्राचे कामकाज पुन्हा सुरु करण्याचे महत्त्व केंद्रीय मंत्र्यांनी अधोरेखित केले. वरिष्ठ अधिकारी आणि इन्व्हेस्ट इंडियाच्या सदस्यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाचे कृती दल यापूर्वीच उद्योग सदस्यांशी समन्व्य साधून त्यांना विविध राज्यांमधील समस्या / आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मदत करत आहेत.
हरसिमरत कौर बादल यांनी देशाच्या विविध भागात पीक कापणी झालेली पिके आणि नाशवंत फळ-भाज्या गमावण्याची प्रमुख चिंता बोलून दाखवली.28 एप्रिल 2020 रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी सर्व सदस्यांना कापणी झालेल्या गहू, भात ,फळे आणि भाज्या आणि अन्य नाशवंत वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुढे येण्याची विनंती केली जेणेकरून कमीत कमी नुकसान होईल आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.
उद्योग क्षेत्रातील सदस्यांनी सध्याच्या काही समस्यांमध्ये मंत्रालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचे नमूद केले. यामध्ये वेगवेगळ्या नियंत्रित क्षेत्रांमध्ये सुविधा पुरवण्यासाठी मानक परिचालन पद्धती , आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यस्तरावर अन्न प्रक्रिया उद्योगासाठी समर्पित नोडल अधिकारी, सुविधा परिचालनासाठी कामगार पास देण्याचा प्रमाणित प्रोटोकॉल, पुरवठा साखळी राखणे, कोविड क्लस्टर्स / प्रदेश ओळखण्याच्या प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या गरजेचा समावेश आहे.
अन्नधान्य कारखान्यांसाठी नियंत्रित क्षेत्रांमध्ये परिचालनाबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना आवश्यक असण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी उद्योगाच्या भूमिकेशी सहमती दर्शविली तसेच जर उद्योगांना कामगारांच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना सुनिश्चित करता आल्या तर 60 ते 75% कामगारांना सुविधा क्षेत्रात परिचालनासाठी परवानगी देता येईल या कल्पनेबाबत देखील त्यांनी सहमती दर्शवली. किरकोळ उद्योग पुनरुज्जीवित करण्याच्या कल्पनेबाबत उद्योगाकडून सूचना मागवण्यात आल्या.
अधिक मूल्याच्या अन्नधान्य पाकिटांच्या मागणीत देशांतर्गत वाढ झाल्यामुळे अन्न उद्योगात वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे सदस्यांनी नमूद केले आणि पुरवठा साखळी पुनर्स्थापित झाल्यावर लगेच उद्योग पुन्हा सुरू होतील असेही सदस्यांनी नमूद केले.
या कठीण काळात अन्नधान्य उत्पादनांचा पुरवठा कायम राखण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल एफपीआयच्या सचिव पुष्पा सुब्रह्मण्यम यांनी फिक्की आणि सदस्यांचे आभार मानले. लॉजिस्टिक, गोदाम , कामगारांची आणि वाहनांची ने-आण संबंधित आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने आधीच आवश्यक सूचना जारी केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एफपीआयच्या सचिवानी उद्योगातील सदस्यांना विशिष्ट समस्या असतील तर तक्रार विभागाकडे सामायिक करण्याची सूचना केली जेणेकरून कृतिगटाला त्याचे निराकरण करणे शक्य होईल. अधिकाधिक कामगारांना सुविधांमध्ये सामील करून घेण्यासाठी उद्योगाकडून एक कृती योजना मागवण्यात आली. तसेच अन्न उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी योजना आखण्यासाठी सदस्यांकडून सूचनाही मागवण्यात आल्या.
फिक्की अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष आणि आयटीसी फूड्स डिव्हिजनचे सीईओ हेमंत मलिक आणि सायमन गेरोजे, अध्यक्ष कारगिल इंडिया, टी. कृष्णकुमार, अध्यक्ष कोका कोला इंडिया, मोहित आनंद, व्यवस्थापकीय संचालक केलॉग इंडिया , दीपक अय्यर, अध्यक्ष इंडिया मॉन्डेलेझ इंटरनेशनल, संजय शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी एमटीआर फूड्स, आर. एस. सोधी, व्यवस्थापकीय संचालक अमूल, तरुण अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी झायडस वेलनेस यासारख्या आघाडीच्या उद्योगातील सदस्यांनी सध्याच्या स्थितीबाबत आणि पुढील वाटचालीसाठी सूचना दिल्या.
उद्योग क्षेत्राच्या शिफारशी संबंधित मंत्रालयाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती उद्योग सदस्यांना देण्यात आली. केंद्रीय मंत्र्यांनी उद्योग सदस्यांना मंत्रालयाकडून आवश्यक सहकार्य पुरवण्याचे आश्वासन दिले आणि सर्व सदस्यांना कोणत्याही मदतीसाठी कृतीदलाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला.
(Source: PIB)
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.