गोरखपूर : राज्य ऊस आणि साखर उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. मात्र, काही साखर कारखान्यांमध्ये कमी उत्पादन आणि कमी साखर उतारा यामुळे शेतकऱ्यांसह कारखान्यांचेही नुकसान होत आहे. काही साखर कारखान्यांनी ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. खास करुन पिपराईच साखर कारखान्याने मदन मोहन मालविय तंत्र विद्यापीठाची मदत घेतली आहे. एमएमएमयूटीचे (Madan Mohan Malaviya University Of Technology) शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या टीमकडून कारखान्याच्या तांत्रिक बाबींसह उसाच्या प्रजातींचीही पाहणी सुरू केली आहे.
याबाबत अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या पिपराईच साखर कारखान्याचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे कारखान्याला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कारखाना व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर कारखाना व्यवस्थापनाने साखर उतारा वाढविण्याचे उपाय शोधण्यासाठी एमएमएमयूटीशी संपर्क साधला. विद्यापीठानेही शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या एका गटाची संशोधनासाठी नियुक्ती केली आहे. शिक्षक, विद्यार्थ्यांनी एकदा कारखान्याला भेट दिली आहे. संशोधकांची ही टीम कारखान्याच्या तांत्रिक बाबींशिवाय ऊसाची प्रजाती, लावण प्रक्रियेचीही पाहणी करेल.