लखनौ : राष्ट्रीय लोक दलाच्या (RLD) एका शिष्टमंडळाने उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेवून त्यांच्यासमोर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या आणि त्यांना १० मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात रालोदचे राष्ट्रीय प्रवक्ते अनिल दुबे, कार्यकारी प्रदेशाध्यक्ष मंजीत सिंह, संयोजक अनुपम मिश्रा, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय महासचिव आरिफ महमूद आणि युवा विंगचे नेते अंबुज पटेल यांसह रालोदचे १२ सदस्य सहभागी होते. निवेदनाची माहिती देताना दुबे यांनी सांगितले की, सहकारी आणि खासगी साकर कारखान्यांकडे आर्थिक वर्ष २०२१-२२ मधील ऊस बिलांची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. पिकांच्या उत्पादनाचा खर्च अनेक पटींनी वाढला आहे. मात्र, शेतकऱ्यांना बाजारात पिकाचा योग्य दर मिळत नाही.
दुबे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे आश्वासन एक तमाशा बनला आहे. शेतकऱ्यांकडे औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. कार्यकारी अध्यक्ष मनजीत सिंह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात दररोज महिन्यांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. युवक नोकरीसाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, सरकारला त्यांच्या दुर्दशेची कोणतीही पर्वा नाही असे ते म्हणाले. शिष्टमंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व्याजासह थकीत ऊस बिले मिळावीत अशी मागणी केली.