कोल्हापूर : एकीकडे उसाची एफआरपी वाढत असताना, दुसऱ्या बाजूला साखरेच्या दरातील वाढ पाहता, संपूर्ण साखर उद्योग अडचणीत आला आहे. यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्याकडील सर्व साखर कारखान्यांची श्वेतपत्रिका महिन्याभरात काढणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली. सौर ऊर्जा आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांची उत्पादन पाहता, मोठ्या कष्टाने उभे केलेले सहवीज व इथेनॉल प्रकल्प आगामी दहा वर्षांत भंगार होतील की काय? अशी भीती वाटत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
राष्ट्रवादी कांग्रेसच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या रथयात्रा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, यंदा साखर कारखाने तीन महिने चालले असून हे विदारक चित्र बदलण्यासाठी ‘एआय’चा वापर करावा लागेल. कारखान्यांनी या नवतंत्रज्ञानासाठी पुढाकार घ्यावा, त्याला जिल्हा बँक मदत करेल. उसाचे एकरी उत्पादन वाढल्याशिवाय आगामी काळात साखर उद्योग चालणार नाही. यामध्ये ‘एआय’ तंत्रज्ञान आशेचा किरण दिसत आहे, असेही ते म्हणाले.
केडीसीसी बँकेने ३३ कोटी तर ‘गोकुळ’ने २८ कोटी नफ्यावर आयकर भरला आहे. सर्वाधिक आयकर भरणाऱ्या राज्यातील दोन संस्था असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. बैठकीला मानसिंगराव गायकवाड यांना पाहून ‘मानसिंगदादा आले म्हणजे आज दुग्धशर्करा योग असल्याचा चिमटा मंत्री मुश्रीफ यांनी काढला. यावर, साहेब, काही झाले तरी मी तुमचाच असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. भाजपसह सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. माजी आमदार संजय घाटगे हे महायुतीत आल्याने आता त्यांना अडचण नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.