महाराष्ट्रात या हंगामात उच्चांकी ऊस आणि साखर उत्पादन झाले आहे. मात्र, या विक्रमासोबतच साखर कारखान्यांसमोर साखरेच्या साठवणुकीची समस्याही निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात ३ एप्रिलपर्यंत ११५७.३१ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यापासून १२०.४४ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्याच्या इतिहासात हे विक्रमी गाळप आहे. या हंगामात सरासरी उतारा गत हंगामातील १०.४७ टक्क्यांच्या तुलनेत १०.४१ टक्के नोंदविण्यात आला आहे. प्रती हेक्टर उत्पादन वाढीमुळे राज्यात १२८ ते १३० लाख टन साखरेचे उत्पादन होण्याचे अनुमान आहे. गेल्या वर्षी साखर उत्पादन १०७ लाख मेट्रिक टन झाले होते. जेवढे साखर उत्पादन वाढेल, तेवढी साखर साठवणुकीची समस्याही तीव्र होणार आहे.
महाराष्ट्रात देशांतर्गत विक्रीवर अवलंबून असलेल्या साखर कारखान्यांना साठवणुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऊसाचे गाळप अद्याप सुरू आहे. उत्पादन केलेल्या साखरेची साठवणूक करण्याची समस्याही काही कारखान्यांसमोर आहे. आगामी हंगामात उसाचे अधिक उत्पादन होण्याची शक्यता आहे.
पीटीआयमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, National State Cooperative Sugar Factories Federationचे प्रमुख जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, महाराष्टात देशांतर्गत साखर विक्रीवर अवलंबून असलेल्या कारखान्यांसमोर साखर साठवणुकीची समस्या अधिक तीव्र झाली आहे.
ते म्हणाले की, ऊस गाळप अद्याप सुरू आहे. उत्पादन केलेल्या साखरेच्या साठवणुकीचा मुद्दा काही कारखान्यांसमोर एक समस्या बनली आहे. हे कारखाने देशांतर्गत बाजारपेठेत साखर पुरवठा करतात. जालना, परभणी, मराठवाड्याच्या काही भागात कारखान्यांकडे साखर साठवणूकीसाठी जागा आहे. त्यांच्याकडील साखर निर्यात केली जाते.
साठवणुकीच्या समस्यावर पर्याय काढण्यासाठी आ्हाला पुढील हंगामाच्या तीन महिने आधी योजना तयार करण्याची गरज आहे असे दांडेगावकर म्हणाले.