मुंबई : महाराष्ट्रात गेल्या महिन्यापासून सलग अवकाळी पाऊस सुरू आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यादरम्यान हवामान विभागाने आता पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने सांगितले की, राज्यात पुढील ४ ते ५ दिवसांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान, वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
नवभारतमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, हवामान विभागाने दिलेल्या पूर्व सूचनेनुसार, विदर्भात यावेळी सर्वाधिक पाऊस कोसळेल. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी हवेचा वेग प्रती तास ३० ते ४० किमी असेल. यादरम्यान हवामान खात्याने विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने आज पुणे आणि परिसरात गारपिटीची शक्यताही वर्तवली आहे.
महाराष्ट्रात तीन दिवसांचा ऑरेंज अलर्टही लागू केला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, विदर्भातही जोरदार पाऊस होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठाड्यात पुढील दोन दिवसांसाठी आणि विदर्भात तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू केला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड, हिंगोलीत वादळी वाऱ्यासह आज पाऊस कोसळेल. जळगावमध्ये जोरदार पाऊस कोसळला असून पुढील काही दिवस अशीच स्थिती राहिल असे हवामान विभागाने म्हटले आहे.